प्रस्तावना

भारतातील अनुवादाचा इतिहास बहुरंगी आहे. सुरुवातीचे भाषांतर पाहिल्यावर असे जाणवते की संस्कृत, प्राकृत व पाली इ. आणि उदयोन्मुख अशा प्रादेशिक भाषांमध्ये व त्याच भाषांचा अनुवाद अरबी, फारशीत झाला असावा. आठव्या व नवव्या शतकात भरतीय कथनात्मक व ज्ञानात्मक साहित्य उदा अष्टांगहृदय, अर्थशास्त्र, हितोपदेश, योगसुत्र, रामायण, महाभारत व भगवतगीता इ. अनुवाद अरबीत झाला होता. त्या दिवसात भारतीय आणि फारसी संहितांमध्ये व्यापक स्तरावर आदान प्रदान झाले होते. भक्तिकाळा दराम्याम संस्कृतमधील संहिता खासकरुन भागवदगीता आणि उपनिषद अन्य भारतीय भाषांच्या संपर्कात आले, फलस्वरूप महत्त्वपूर्ण संहिता जसे मराठी संत कवी ज्ञानेश्वरकृत गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरी, तसेच विविध भाषातील संत कवींनी केलेली रामायण आणि महाभारतात सारख्या मह्मकाव्यांची रूपांतरे प्रकाशात आली. उदाहरणादाखल पंपा, कंभार, मोला, जूथाचन, तुलसीदास, प्रेमानंद, एकनाथ, बलरामदास, माधव कंदली आणि कृत्तिवास इ.

वसाहतवादी कालखंडात यूरोपियन तथा भारतीय भाषांमध्ये (खासकरुन संस्कृतमध्ये) अनुवादाच्या क्षेत्रात नव स्फुरण झाले. तेव्हा हे आदान-प्रदान जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश तथा भारतीय भाषांमध्ये झाले होते. इंग्रजीच्या प्राधान अस्तित्वामुळे ती एक विशेषाधिकारी भाषा समजली जात होती, कारण वसाहतवादी अधिकारी याच भाषेचा वापर करत होते. इंग्रज शासनकाळातील इंग्रजीतील अनुवाद चरमोत्कर्षावर पोचला जेव्हा विलियम जोन्स द्वारा कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलचा अनुवाद केला गेला. आज शाकुंतल हा ग्रंथ म्हणून भारताच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेचे मानचिन्ह आणि भारतीय जाणिवेतील एक प्राथमिक ग्रंथ बनला आहे. यावरून १९ शतकात याची दहाहून अधिक भारतीय भाषेत भाषांतरे का झाली असावीत हे स्पष्ट होते. अनुवादाच्या क्षेत्रात इंग्रजी (वसाहतवादी) प्रयत्न पौरात्य विचारधारांवर आधारित होते, आणि नव्या शासकांसाठी आकलन, परिचय आणि श्रेणीबद्ध करण्याच्या व भारतावर आधिपत्य गाजवण्याच्या हेतू पुरस्कार केले गेले होते. त्यांनी आपल्या परीने भारताची एक छबी निर्माण केली, त्यावेळी इंग्रजी संहितेचे भारतीय अनुवादक त्याचा विस्तार, शुद्धिकरण आणि सुधार करू इच्छीत होते. कधी-कधी ते वैचारिक मतभेदाद्वारे इंग्रजी विचारधारांचा विरोध करत होते. ज्यांची लढाई समकालीन संहिता व्यतिरिक्त प्राचीन संहितांवरच आधारलेली होती. राजा राममोहन रॉय यांच्याद्वारे अनुवादित शंकराचे वेदांत, केन आणि ईश्वास्य उपनिषद इ. संहिता म्हणजे भारतीय विद्वानांच्या माध्यमाने इंग्रजी अनुवादाच्या क्षेत्रात पहिला भारतीय हस्तक्षेप होता. याचेच अनुकरण करून आर.सी.दत्त यांनी ऋग्वेद, रामायण, महाभारत आणि इतर काही शास्त्रीय संस्कृत नाटकांचा अनुवाद केला. या अनुवादांचे उद्देश म्हणजे भारतीयांच्या सुप्तावस्थेतील स्वच्छंदतावादी आणि उपयोगितावादी विचारांचा विरोध करणे. त्यानंतर अनुवादाच्या क्षेत्रात जणू पूर आला, ज्यात दिनबंधु मित्र, अरबिंदो और रवींद्रनाथ टागोर इ. प्रमुख अनुवादकांचा समावेश होता. जवळजवळ याच काळात भारतीय भाषांमधील अनुवादाची मर्यादीत प्रमाणात श्रीगणेशा झाली.

वास्तविक बहुसंख्य सुशिक्षित भारतीयांसाठी इंग्रजी आजही दुर्गम आहे. व त्यांचे सबलीकरण केवळ महत्त्वपूर्ण साहित्य आणि ज्ञान आधारित पाठांच्या भारतीय भाषांतील अनुवादाच्या माध्यमातून संभव होते. इथे अनुवादाच्या संदर्भात गांधीजींचे विचार समर्पक ठरतील “माझ्यामते इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दळणवळणाची भाषा असल्याने काही लोकांनी ती शिकणे महत्त्वपूर्ण आहे. अशा माणसांना इंग्रजीवर प्रभुत्व प्राप्त करण्यास मी प्रोत्साहन देईन....... व त्यांनी इंग्रजीतील सर्वश्रेष्ठ पुस्तके स्थानिक भाषेत अनुवादित करावीत अशी आशा बाळगतो.” इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारल्यास भारतीय भाषांच्या विकासात बाधा येऊ शकते याची जाणीव त्यांनाही झाली होती.

एल.एम. खूबचंदानींनी निर्देशीत केल्याप्रमाणे, पूर्व वसाहतवादी भारतातील शैक्षणिक व्यवस्था पाठशाळा आणि मकतब याद्वारे चालवली जात होती. शालेय शिक्षणाला सामाजीकरणाची पहिली पायरी समजले जाई, जी भाषिक कौशल्यांची शृंखला, व स्थानीय बोलींपासुन ते दर्जेदार भाषशैलीपर्यंतच्या विविध प्रकारच्या बोधगम्य बोलींचा एक क्रम विकसित करण्यास मदत करी. विविध प्रकारच्या व्यावहारिक भाषा आणि लिप्या शिकणाऱ्यांना उत्कृष्ट आणि सरळ भाषिक कलाकृतीने सुसज्ज करी. भारतातील पारंपरिक भाषिक वैविध्यतेमुळे अस्वस्थ झालेल्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये अंतर उत्पन्न करून भारतीय शिक्षणास एकात्मक समाधान पुरवले. भारतीय शिक्षणात मॅकालेचा मसुदा (१८३५) आणि त्याचे पूर्वाधिकाऱ्यांनी भारतीय भाषांना नजरेआड केले. उत्तरवसाहतवादी काळात शिक्षाणाच्या माध्यमाच्या रूपात मातृभाषेचा वापर वाढू लागलेला दिसतो. आणि मनोवैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मूल आपल्या मातृभाषेतून लवकर शिकते असे यूनेस्को (UNESCO) शिफारस करते. जे अनेक भाषा योजना प्राधिकरणांद्वारे स्वीकारले गेले आहे.

त्यासाठी आपण, समाजातील प्रातिनिधिक भाषांसाठी आपल्या समाजात आणि विद्यालयात योग्य वातावरण निर्मिती करणे गरजेचे आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांसाठीही वाङमयीन आणि ज्ञान-आधारित पाठांचे अनुवाद मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. आणि उर्ध्व रूपात पाश्चिमात्य दाता भाषेमधुन ज्ञान-आधारित पाठ आणण्यापेक्षा समांतर रूपात अशा पाठांचा अनुवाद एक भारतीय भाषेतून दुसऱ्या भारतीय भाषेत करणे महत्त्वपूर्ण आहे. (सिंह १९९०).

जे आपल्या मातृभाषेत सर्वोच्च ज्ञान प्राप्त करू इच्छितात, अशा भारतातील सामान्य स्त्री-पुरूषांनासुद्धा ही माहिती उपलब्ध झाली पाहीजे असा आमचा अटळ विश्वास आहे. हाच तो मूलाधार आहे ज्याद्वारे राष्ट्रीय अनुवाद अभियानाची कल्पना अस्तित्वात आली.